संग्रामपूर :सर्वप्रथम सन२००४ मध्ये आमदार झालो तेव्हा जळगांव जामोद मतदारसंघ अविकसित होता, निधी मिळत नव्हता त्यामुळे जिगाव प्रकल्प होईल का? याची शाश्वती नव्हती.म्हणून मतदारसंघातील विविध विकास कामावर लक्ष केंद्रित केले.दुसऱ्या टर्म मध्ये जिगावची २००७-२००८ मध्ये पहीली सुप्रमा आली.तेव्हापासून आशेचा किरण दिसू लागला.मध्यंतरीच्या काळात माहिती मिळाली की रस्ते आणि पूल जे बुडणार आहेत ते ही करता येतात त्यासाठी निधी मिळवून पूर्णा नदीवरील पुलांची कामे केली.२०१४ मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हा जिगाव प्रकल्पाबाबत पाठपुरावा सुरू केला.जिल्ह्याची आढावा बैठक २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली तेव्हा जिगाव प्रकल्प प्राधान्याने त्यांच्या वॉररूम मध्ये घेण्यासाठी आग्रह केला आणि त्यांनी संमती दिल्याने प्रकल्पाला गती मिळाली.आता नुकतीच जिगाव प्रकल्पाची ३५ हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता आल्यामुळे हा प्रकल्प दृष्टिक्षेपात असल्याचे प्रतिपादन जळगांव जामोद मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी जिगाव प्रकल्पस्थळी विविध कामाच्या उदघाटन,निरीक्षण प्रसंगी केले.
यावेळी मंचकावर आ.डॉ.संजय कूटे,भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष
कैलास पाटील,श्रीराम हजारे अधीक्षक अभियंता जिगाव प्रकल्प,रंगराव देशमुख, राजेंद्र गांधी,गुणवंत कपले,बंडू पाटील,देविदास घोपे,चंदाताई पुंडे,प्रदीप सांगळे,राजेंद्र हेलगे,गणेश दतीर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रगीतासह भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते ३०६० कोटीच्या कामांचे उदघाटन फलक अनावरण करून करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ.कुटे म्हणाले की,जिगाव सह मतदारसंघातील प्रकल्प बळीराजा योजनेत समाविष्ट झाले आहेत.विदर्भात केवळ जिगाव प्रकल्पासाठी सरळ खरेदीने जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.प्रकल्पातील पहिल्या टप्यातील गावाचं भूसंपादन, पुनर्वसन जवळपास झालेल आहे.येणाऱ्या दोन तीन महिन्यात पहिल्या टप्यात पाणी अडविण्याच काम सुरू होणार आहे.दोन ते तीन वर्षांत पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.जळगांव जामोद मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणात आमूलाग्र बदल जिगावच्या माध्यमातून होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे यांनी जिगाव प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती देत प्रकल्पाचा प्रवास विशद केला.कार्यक्रमाला बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

