संग्रामपूर: वीस वर्षाआधी मतदारसंघात पायाभूत सुविधांची वानवा होती.गेल्या चार टर्म मध्ये नियोजनबद्ध पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलल्याचे प्रतिपादन मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी केले ते विविध विकास कामाच्या उदघाटन,निरीक्षण प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
स्थानिक सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंचकावर आ.डॉ.संजय कुटे,भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे,उपविभागीय अभियंता प्रवीण पुंडकर,भाजप शहराध्यक्ष कैलास पाटील,राजेंद्र ठाकरे,बंडू पाटील,जळगांव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जैस्वाल,रंगराव देशमुख,गुणवंत कपले,चंदाताई पुंडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थित होती.
कार्यक्रमात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करणवाडी ते पिंपळगांव काळे,जळगांव जा ते सोनाळा ते जिल्हा सिमीपर्यंत आलेल्या सुमारे ३००कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.तर कार्यक्रमात डॉ.संजय कुटे यांनी उपस्थित मान्यवरांसह विकासकामाच्या कोनशिलेचे अनावरण केले.
पुढे बोलताना आ.डॉ.कुटे म्हणाले की,करणवाडी पासून होत असलेल्या ४० किमीच्या रस्त्याच्या दुतर्फा वड,पिपळ या सारखी सुमारे १३ हजार झाडे लावण्यात येऊन सुशोभीकरण करण्यात येणार आहे.मागील पाच वर्षांपासून या रस्त्याची प्रतीक्षा होती.महाविकास आघाडीच्या काळात यश आलं नाही.महायुतीच्या काळात सगळ्यात पहिला ए.डी.बी चा रस्ता जळगांव जामोद चा खांडवी उकळी हा रस्ता नवीन टेक्नॉलॉजी चा आहे.शेगाव ते बऱ्हाणपूर रस्त्याचं ६०० कोटींच टेंडर निघणार आहे.यामध्ये घाटात दुपदरीकरण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे मंजुरातीसाठी पाठवलेले आहे.लवकरच याचही टेंडर निघणार आहे.मतदारसंघात पायाभूत सुविधा मजबूत केलेल्याआहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे चांगले अधिकारी लाभले आहे.अधिकारी आणि कर्मचारी यांना आता पुरेशी निवासस्थाने उपलब्ध आहेत.सर्व शासकिय कार्यालयाचे नवीन बांधकाम पूर्णत्वास जात आहेत.जळगांव मध्ये जिल्ह्यातील एकमेव केंद्रीय विद्यालय सुद्धा लवकरच मंजूर होणार आहे.मौजे वायाळ शासकीय आयुर्वेद कॉलेज व १०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले आहे.त्यासाठी सुमारे ४८७ कोटी रुपये मंजूर झाला आहे.आयुर्वेद रुग्णालय २५ एकरात उभारण्यात येणार आहे.
मतदारसंघात चांगल पर्यटन केंद्र गोरळा या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे.आदिवासी संस्कृतीसह प्रदर्शन करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा भवन, गोरळा धरण परिसर पर्यटन केंद्र विकसित करणार आहे.अंबाबरवाचा येत्या दोन वर्षात विकास करून जागतिक नकाशावर आणणार आहे.
जामोद,सोनाळा रेल्वे होत आहे.जामोद पासून तुकईथळ पर्यंत ९ किमीचा बोगदा होणार आहे. या मार्गासाठी २००० कोटींचा निधी आहे.येणाऱ्या पाच वर्षात प्रक्रिया उद्योग सुरू करून रोजगारक्षम मतदारसंघ निर्माण करणार असल्याचा मानस त्यांनी बोलतांना व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक कार्यकारी अभियंता सुनील थोटांगे यांनी केले.
कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.

